More on this book
Community
Kindle Notes & Highlights
by
V.P. Kale
Read between
May 21 - December 4, 2023
थंड पडत जाणारं आयुष्य असंच, गार झालेल्या अन्नाप्रमाणे गरम करीत राहायचं.
‘अंत’ आणि ‘एकांत’ ह्यांपैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
वास्तविक, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं.
प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?’
अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच.
ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना.
स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म.
ही माणसं आयुष्य काढतात. जगत नाहीत.
अनेक माणसांच्या बाबतीत, ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. ‘अर्थ असलेला पुरुष’ म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत.
द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही.
माणसाने फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं, हे ठरवायला हवं. आणि ते मात्र लवकर ठरवावं.
स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच ‘पालक’ शब्द समजला.
बेदम पैसा मिळवणं ह्याच्याइतकं मिडीअॉकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं.
संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच ‘अणू‘च्या शोधापेक्षा महान शोध आहे.
आपल्यावाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते.
दुसऱ्याच्या पगाराची, मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे ‘तुम्हाला आता काय कमी आहे?‘– असंही फाडकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात.
‘आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतोय.’
माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो.
ज्यांना हे असं हरवता येत नाही, ते रिकाम्या वेळेचे बळी होतात. रिकामा वेळ सैतानाचाच.
जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो.
‘चहा घेणार का?’ ह्या निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नाला, अभावितपणे होकार जातो, तेव्हा जर नवल वाटलं तर ओळखावं, हा होकार सवयीने दिला.
वयानुसार सवयी बदलतात आणि मग ‘वय’ झालं तरी सवय राहते.
‘किती दमता तुम्ही?’ ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही.
एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला.
अशी ही मोठीमोठी माणसं छोट्या माणसांना करार करून बांधून घेतात. सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभी करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक लागून आपण गुलाम कधी झालो हे कळत पण नाही.
लग्नामुळे ‘स्त्री’ वा ‘पुरुष’ पारतंत्र्यात गेले असं न होता त्यांच्या स्वतंत्र विहारात त्यांना एक साथीदार मिळाला असं का होऊ नये?
प्रेमाने माणूस ताकदवान बनला पाहिजे. नवरा-बायकोंचं एकमेकांवर अमर्याद प्रेम शेवटी गुलाम बनवण्याची शाळा ठरतं.
भीतीपायी माणूस लांब राहतो. अनुभवातून जाण्याचं तो नाकारतो. त्यापायी खऱ्या शक्तीची, व्यक्तीची ओळख होत नाही. भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही. भिणारा माणूस संशोधनही करत नाही.”
सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत.”
अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे, ह्याचा हिशेब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. ‘मन रमवणं’ ह्या नावाखाली गप्पागोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळणं, पार्ट्या, सिनेमेच सिनेमे बघत सुटणं, निंदानालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांच्या भानगडींची साप्ताहिकं वाचणं आणि ह्यांपैकी काहीही नसेल तर दिवसच्या दिवस लोळून काढणारे बहाद्दर मी पाह्यले आहेत.
प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही.
कल्पनाशक्ती तरल असली आणि जवळ थोडी धडाडी असली म्हणजे आयुष्य चाळिशी-पन्नाशीला थांबत नाही.
माणसाचं मन विचित्रच! म्हणूनच त्याच्या मागण्यासुद्धा तशाच! त्या मागण्या ज्याच्या त्याला आकलन होत नाहीत. पण एक नक्की! कोणतं ना कोणतं वेड त्याला हवं असतं.
थैलीचं तोंड सुटलं की सुटणारी तोंडं घट्ट मिटतात. नीती-अनीतीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतात. म्हणूनच पैसेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरणं सोपं जातं. कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात.
बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण मनाने, विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसऱ्या बाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरुषांचं निम्मंअधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरुष फायदा घेतात, ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्रीवर्ग परंपरेने घोकत आला आहे.
कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो.
माणसाजवळ दोन गोष्टींपैकी एक गोष्ट असायलाच हवी. एक तर दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करता येतील अशी शक्ती हवी. ती शक्ती नसेल तर दुसऱ्याला जबर उपद्रव देता येईल अशी एखादी यंत्रणा हवी. ह्यापैकी काहीच नसेल किंवा जितक्या प्रमाणात ह्या गोष्टी जवळ असतील तितक्या प्रमाणात तुमचं आयुष्य सोपं किंवा अवघड होईल.
एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी खाल्लं तर श्रावणी!’
आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला असतो
आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात, त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं.’
माणूस जन्मभर सुखामागे, ऐश्वर्यामागे धाव धाव धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते.
होतं.मित्रांनो, दुःख टंचाईमुळे निर्माण होत नाही, चिकित्सक वृत्तीपायी निर्माण होतं.
संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यांत जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते.
बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरून शंखात कोंडून घेतो.
आपल्या परिस्थितीला दुसरा कुणीतरी जबाबदार आहे ह्या विचाराचा फार आधार वाटतो.
‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल, झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी, स्वतःची जागा सोडून ती सावलीचा वर्षाव करीत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागेचा शाप असतो. छत्र आणि छत्री ह्यात फरक असतो.’ ‘तेच छान आहे, नाहीतर ह्या कृतघ्न माणसांनी झाडांची अवस्था छत्र्यांसारखीच करून टाकली असती.’
‘आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेने, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःतला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार, हा टाकायचा भाग...’
शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं, शरीराला जपायचं. मन बोंबलत राह्यलं तरी ते मारत राहायचं. एवढंसं कुठं कुसळ गेलं तर डॉक्टरकडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात. तो सल कुणी काढायचा?
बंधनं पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणंच.
पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात.