कसलं स्वतः होऊन स्वातंत्र मिळवणार हो असल्या बायका? तिकडे युरोपात बारक्याबारक्या हक्कासाठी लोकांनी अतोनात त्याग केले, आयुष्यं बरबाद केली, कुर्बान्या केल्या म्हणून त्यांच्या समाजात आताआता हे व्यक्तिस्वातंत्र्य आलं. ते जसंच्या तसं काही कवडीची तोशीस लागू न देता ह्या शहरी लोकांनी इकडे अनुकरणानं उचललं. मला असल्या फॅशनेबल स्वातंत्र्याबद्दल काहीच आस्था नाही. इथल्या ह्याच आपल्याच समाजात सगळ्या अंगांनी जे मिळवता येईल ते खरं, कायम टिकणारं होईल. आपण वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी काय त्याग केले? आयतं इंग्रजांकडून घेतलं आणि आता त्यात सगळे जातीय हिंदुत्ववादी घुसून बसले. काय उपयोग?