भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!

