‘कशाच्या बळावर? फाशांच्या? ती कला अजून शकुनींनाही अवगत झाली नाही. युवराज, स्वतःचं रूप फाशांच्या पटावर विसरू नका. भर स्वयंवरातून राजकन्येचं हरण करण्याचं ज्याचं धार्ष्ट्य आहे, मित्रासाठी अंगदेशाचं राज्य फेकण्याचं ज्याचं औदार्य आहे, ज्याच्या हातातली गदा बलरामकृपेनं अजोड आहे, तो कौरवराज्याचा युवराज द्यूतपटामध्ये गुंततो, याखेरीज दुर्दैव कोणतं? शकुनींच्या हस्तलाघवानं राज्यं सांभाळली जात नाहीत. रणांगणावरचा जुगार निश्चितपणं द्यूतपटावर ठरवला जात नाही.’