घनमेघाने सूर्य झाकावा, तसा भास द्रौपदीला झाला. भीष्माच्या उत्तराने दुर्योधन- कर्ण आनंदित झाले. विदुर-विकर्णासारख्या सज्जनांनी द्रौपदीची बाजू घेतली; पण भीष्मनिर्णयामुळे ते समर्थन कौरवसभेत दुबळे ठरले. भर समुद्रात, वादळात सापडलेल्पा नौकेच्या एकुलत्या एका शिडाच्या चिंध्या व्हाव्यात आणि दैवगतीच्या लाटांवर लक्ष्यहीन नाव हेलकावे घ्यावी, तशी पांचालीची अवस्था झाली.