एकदाचा वाचून झाला. पुस्तक कंटाळवाणे होते असे नाही. मला वेळ नव्हता असे सुध्दा नाही. पण या पुस्तकात दुःख, शोषण, अन्याय, विरह, कुचंबणा, अपयश एवढे टिच्चून भरले आहे की ते एकाच वेळी ग्रहण करणे शक्य नाही. मला तरी शक्य नाही. गांधी वध करणाऱ्याचा भाऊ, एवढाच काय तो दोष गोपाळ गोडसेंचा पण तरीही त्यासाठी विनाकारण १५ वर्षे कारागृहात काढावी लागली. चांगल्या वर्तनामुळे तब्बल ८ वर्षे जमवलेली सूट, तेव्हाच्या कॉंग्रेसप्रणीत सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे प्रत्यक्षात मात्र मिळाली नाही. या शासनाच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात संघर्ष केला आणि जणू अपयशाची मालिकाच सुरू झाली. हे प्रकरण अंगी येणार असे वाटले तेव्हा त्यांना कलम ४०१ द्वारे दया देण्यात आली.
पुस्तकाची भाषा एका मराठीप्रेमीची मान गर्वाने उंच करणारी आहे. या एवढ्या शुध्द भाषेमागे लेखकाचे संस्कृत ज्ञान दिसून येते. प्रत्येक प्रकरण तर्कशुद्ध, तर्कसंगत लिहिले गेले आहे. भाषाप्रेमी असाल तर पुर्ण पुस्तक कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. सहनशील असाल व शुद्ध भाषा झेपत असेल तरच हे पुस्तक हातात घ्या.