SAMBHAJI MAHARAJ WAS THE ELDEST SON OF SHIVAJI MAHARAJ AND THE SECOND CHHATRAPATI OF MAHARASHTRA. HIS IMAGE HAS BEEN DISTORTED BECAUSE OF INSUFFICIENT AND WRONGFUL HISTORICAL TOOLS. HE IS PRESENTED AS A WOMANISER, AN ADDICT, A CRUEL AND IRRESPONSIBLE PERSON. LATER ON, PROOFS WERE GATHERED WHICH BROUGHT THE TRUTH TO LIGHT SHOWING THAT SAMBHAJI MAHARAJ WAS WRONGLY ACCUSED. WITH THE HELP OF AVAILABLE LITERATURE PRESENTING HIM IN A NEW LIGHT BY HISTORIANS, DRAMATISTS, LITTERATEURS, AUTHORS, ETC. THIS CURRENT BOOK REVEALS HIS PERSONA IN A DIFFERENT WAY. THE DETAILED DISCUSSIONS AND READY REFERENCES HELP US TO UNDERSTAND THE CHARACTER IN A BETTER WAY. संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. अपुर्या आणि चुकीच्या ऐतिहासिक साधनांमुळे संभाजीराजांची प्रतिमा डागाळलेल्या स्वरूपात समोर आली. संभाजीराजे हे व्यसनी, स्त्रीलंपट, क्रूर आणि बेजबाबदार होते, असं चित्र या चुकीच्या साधनांमुळे निर्माण झालं; पण कालांतराने काही असेही पुरावे उपलब्ध झाले, ज्या पुराव्यांमुळे संभाजीराजांवरील आरोपांमध्ये तथ्य नव्हतं, हे सत्य समोर आलं. तर इतिहासकारांनी, नाटककारांनी, साहित्यिकांनी, ललित लेखकांनी जुन्या-नव्या साधनांच्या आधारे संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध, त्यातून होणारं संभाजीराजांचं दर्शन आणि त्यांच्या व्यक्तिचित्रणातील सत्यासत्यता याची सविस्तर आणि ससंदर्भ चर्चा करणारं पुस्तक आहे ’छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ.’
डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर या खेडेगावात झाला. सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेले गाव आणि शिक्षणाचे महत्त्व जाणलेले वडील, यांमुळे डॉ. पवारांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंंग’मध्ये ते केवळ एक ट्रंक व वळकटी घेऊन दाखल झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून इतिहास विषयातून ते बी.ए. व नंतर एम.ए. झाले. कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठात एम.ए.ला त्यांनी इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवला. एम.ए. उत्तीर्ण झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन साहाय्यक म्हणून निवड केली (१९६४). वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली.
पुढे १९६९ ते २००१ या काळात डॉ. पवारांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संपादनातून तयार झालेला हा स्मारक ग्रंथ म्हणजे अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ इतिहासकार आणि साहित्यिकांनी संभाजी महाराजांवर लिहिलेल्या विविध लेखांची एकत्र गुंफलेली माळच आहे. डॉ.कमल गोखले, वा.सी. बेंद्रे, विजय देशमुख, रियासतकार सरदेसाई, नरहर कुरुंदकर,सेतुमाधवराव पगडी, डॉ. अ.रा.कुलकर्णी द.ग.गोडसे, जदुनाथ सरकार आदि इतिहासकारांची व इतिहास संशोधकांची इथे मांदियाळी आहे तर निनाद बेडेकर, शिवाजी सावंत, गो,नि.दांडेकर, वसंत कानेटकर, स्वा. सावरकर आदि साहित्यिकांनी इथे आपले ‘संभाजी’मन उघड केले आहे. या ग्रंथाला डॉ. जयसिंगराव पवार यांची ९५ पानांची विस्तृत प्रस्तावना लाभली आहे. या सर्व लेखकांनी संभाजी राजांच्या जीवनातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती हि कि हे पुस्तक म्हणजे स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींचे कालक्रमानुसार लिहिलेले चरित्र नसून त्यांच्या आयुष्यावर आणि कार्यकर्तुत्वावर विविध इतिहासकारांनी आणि लेखकांनी आपापल्या परीने टाकलेला प्रकाश आहे. उदा. कमल गोखले यांच्या लेखाचा विषय ‘युवराज संभाजी’ हा आहे तर वा.सी. बेंद्रे यांनी ‘संभाजी महाराजांचे मंचकारोहण आणि राज्याभिषेक’ यावर लिखाण केले आहे. रियासतकार सरदेसाई यांचा लेख ‘संभाजी राजा रणांगणावर’ हा आहे. या पुस्तकामध्ये आपणाला युवराज संभाजीराजे भेटतात तसेच महाराज संभाजीराजे देखील भेटतात. आपल्याला रणझुन्झार संभाजीराजे भेटतात तसेच साहित्यिक संभाजीराजेसुद्धा भेटतात. इथे आपल्याला हे समजते कि आतापर्यंत जवळपास ६० पेक्षा जास्त नाटके अथवा इतर साहित्यकृतींमधून संभाजी राजांचे एक खोटे चित्र आपल्यापुढे उभे केले गेले होते ज्याला मल्हार रामराव चिटणिसाची बखर प्रामुख्याने कारणीभूत होती. ‘तुळसा’, ‘गोदावरी’, ‘थोरातांची कमळा’ वैगेरे पात्रे, जी जाणीवपूर्वक संभाजीराजांच्या चरित्रात घुसडली गेली, ती सर्व पात्रे इथे गळून पडतात. तर ‘श्री सखी राज्ञी’ महाराणी येसूबाई आणि कवी कलश यांचे संभाजी राजांच्या जीवनातील महत्व इथे आपणास कळते. परिशिष्टांमध्ये संभाजी राजांचे दानपत्र आणि इतर महत्वाची पत्रे आहेत. एकंदरच, संभाजी राजांविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या वाचकासाठी हा ग्रंथ नक्कीच उपयोगी आहे.