आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे भारतातील थोर गांधीवादी नेते, तत्त्वचिंतक आणि समाजवादाचे पुरस्कर्ते होते. ते गांधी, टिळक आणि मार्क्स यांना आपले गुरु मानत. परंतु आपल्या या गुरूंच्या कार्याची समीक्षा करताना आणि त्यांच्या चुका दाखवून देताना जावडेकरांनी जी तटस्थता दाखविली, ती निश्चितच वादातीत ठरली आहे. आचार्यांनी आपल्या जीवनात अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ मराठी साहित्यामध्ये एक मैलाचा दगड ठरला आहे. थोर तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांनी ‘गीतारहस्यानंतरचा मराठी साहित्यामधील थोर ग्रंथ” असे याचे वर्णन केले आहे. ‘आधुनिक भारत’ यामध्ये जावडेकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची चिकित्सा केलेली आहे. यात पेशवाई संपल्यापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळालेपर्यंतचा इतिहासाची विस्तृत मांडणी व समीक्षा केली आहे. ६०८ पानी या ग्रंथामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी ते लोकहितवादी यांचेपासून ते महात्मा गांधी यांचेपर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबधित इतिहास यामध्ये अभ्यासिला गेला आहे. याबरोबरच महाराष्ट्र व भारतातील सुधारणावादी चळवळीवर देखील प्रकाश टाकला गेला आहे. १८८५ साली राष्ट्र्सभा स्थापन झालेनंतरचा इतिहास हा राष्ट्र्सभा, तिच्या चळवळी व तिचे नेते यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे. परंतु भारतातील सशस्त्र क्रांतीवाद यावर इथे विस्तृत लेखन केले गेले नाही.
या पुस्तकाविषयी एका वाक्यात माझे मत सांगायचे झाल्यास मी म्हणेन कि, ज्या कोणाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल किंवा माहित असेल अशा प्रत्येकाने हा ग्रंथ एकदा अवश्य वाचावा. आपल्या शालेय क्रमिक पुस्तकांमध्ये शिकविला गेलेला इतिहास ज्यामध्ये ‘जहाल’ नि ‘मवाळ’ हे शब्द केवळ मांडून सोडले होते, त्यावर इथे विश्लेषणे अभ्यास करता येतो. टिळकवादी ‘जहाल’ राजकारण व आगरकरवादी ‘मवाळ’ राजकारण व समाजकारण यांची विस्तृत समीक्षा जावडेकरांनी केली आहे. आपणास टिळक आणि आगरकरांचे विचार आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून येते. त्याचबरोबर टिळकांकडून गांधीजींकडे नेतृत्व गेल्यानंतरचा घटनाक्रम व कारणमीमांसा हे देखील छान पद्धतीने मांडली गेलेली आहे. टिळक आणि गांधी या दोघांचा लढा हा निशस्त्र क्रांतीवाद प्रकारात मोडणारा होता. टिळकांनी पुरस्कारिलेला बहिष्कारवाद आणि गांधींचा असह्कारवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना देखील काही टिळकवादी नेते त्यांच्या पश्यात गांधीजींच्या विरुद्ध का गेले याची कारणे इथे आपणास मिळतात. जीनांच्या द्विराष्ट्र’दाव्याला का यश मिळालं नि राष्ट्र्सभेचे नेते त्यांना रोकण्यात अपयशी का ठरले याची कारणे देखील या पुस्तकात चर्चिली गेली आहेत.
या पुस्तकाचा सर्वात सुंदर भाग आहे तो शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये.... या प्रकरणांमध्ये गांधींच्या ‘सत्याग्रह’ या कल्पनेची सुंदर चिकित्सा केली आहे. आणि त्याच बरोबरीने मार्क्सच्या साम्यवादावर देखील प्रकाश टाकला आहे. सरतेशेवटी, गांधीवाद आणि मार्क्सवाद यांच्यातील समन्वय साधून व दोष काढून नव्याने जन्मलेल्या ‘सत्याग्रही समाजवाद’ या संकल्पनेची माहिती जावडेकरांनी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये आपणाला करून दिली आहे. या पुस्तकातूनच मला एका नव्या पुस्तकाच्या अभ्यासाची प्रेरणा मिळाली....
“सत्याग्रही समाजवाद- गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय (आचार्य जावडेकरकृत मीमांसा)”...